नगर जिल्ह्यात महायुती स्वबळावर? राष्ट्रवादीचे आमदार दातेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “आता पक्षाने..”

Ahilyanagar News : आपल्या जिल्ह्यामध्ये विधानसभेचे चार आमदार असून एक विधानपरिषदेचा आमदार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची ताकद मोठी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची ताकद दाखवावी लागेल. वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे असे सूचक वक्तव्य पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन 10 जून रोजी पुणे बालेवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीत आमदार संग्राम जगताप, आ. काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, प्रा. माणिकराव विधाते यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम करावे. त्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. पक्षाचे संघटन मजबूत असल्यावर खऱ्या अर्थाने नागरिकांचे काम मार्गी लागत असतात. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता आपला विकासाचा अजेंडा तयार करून गाव पातळीवर, वार्डात काम करावे. आम्ही आमचा अजेंडा तयार करून काम करतो. निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी सातत्याने काम करत राहणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार आपण सर्वांनी काम करावे. पक्षामधील मतभेद बाजूला ठेवून नवीन फळी तयार करा, मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे काम देखील सुरू करा. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तारीख ठरली! निवडणुका तोंडावर.. मंत्री देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा